देशमुख हत्याकांड: खा.सोनवणेंनी ठोठावला मानव अधिकार आयोगाचा दरवाजा
दिल्लीत प्रियांक क्रानूनगोंची घेतली भेट
बीड! प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला २५ दिवस उलटले तरी अद्याप मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, संतोष देशमुख यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना ही शरमेची बाब आहे. यामुळे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने यात स्वतंत्रपणे चौकशी करावी, असे निवेदन खा.बजरंग सोनवणे यांनी आयोगाचे सदस्य प्रियांक क्रानूनगो यांना भेटून दिले आहे.
दि.९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याचे समजल्यानंतर सर्वात पहिल्यांदा संतोष देशमुख यांचा जीव वाचावा, यासाठी खा.सोनवणे यांनी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्याशी संपर्क केला. दरम्यान, त्यांनी फोन घेणे टाळले. शिवाय केज पोलीसांनी देखील हे प्रकरण गांभिर्याने घेतले नाही. परिणामी, या कालावधीत संतोष देशमुख यांचा मानसिक व शारीरिक छळ करुन हत्या झाली. पोलीसांनी वेळेत सुत्र फिरविले असते तर कदाचित स्व. संतोष देशमुख यांचा जीव वाचलाही असता. दरम्यान, त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना इतक्या वाईटपध्दतीने मारहाण केली की शरिरावर जागा देखील शिल्लक नव्हती. त्यांच्या देहाला चटके देखील देण्यात आले. शिवाय शवाची विटंबना देखील करण्यात आली. इतक्या अमानुषपध्दतीने मारहाण झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडालेली आहे. दि.९ डिसेंबर रोजी हत्या झालेली असून यातील चार आरोपी अटक आहेत तर ३ अद्याप फरार आहेत. सदरील प्रकरणात राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून तपास करावा, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी आज दि.३ जानेवारी रोजी दिल्ली येथे मानव अधिकार आयोगाचे प्रियांक क्रानूनगो यांच्याकडे केली आहे. संतोष देशमुख यांच्या खुन्यांना शिक्षा देऊन देशमुख कुटूंबियांना न्याय देण्यासाठी खा.सोनवणे यांनी पहिल्या दिवसांपासून ठोस भुमिका घेतलेली आहे. यासाठी संसदेत आवाज उठविणे, संसदेबाहेर आवाज उठविणे, पोलीस यंत्रणेशी बोलणे आणि कायद्याच्या कसोटीवर तपास करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
