केज! प्रतिनिधी
मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, बीड यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील 1700 गरीब, परित्यक्ता, विधवा, एकल महिला तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले. हा भव्य वितरण कार्यक्रम नवचेतना इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावर्षी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या खर्चामुळे अनेक लहान व गरजू शेतकरी आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. या परिस्थितीचा विचार करून नाम फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून निवड करण्यात आलेल्या 1700 गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उपलब्ध करून दिले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या शेती खर्चातही लक्षणीय बचत होणार आहे.
कार्यक्रमाला नाम फाऊंडेशनचे प्रतिनिधी म्हणून अभिजित पाटील व शुभम पाटील हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचे सक्षमीकरण आणि शेतीला आधार देण्यासाठी नाम फाऊंडेशन सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. समाजातील सर्वात वंचित आणि गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या सचिव मनिषा घुले यांनी नाम फाऊंडेशनचे आभार मानत सांगितले की, मराठवाड्यातील अनेक महिला शेतकरी, विधवा, परित्यक्ता व अल्पभूधारक कुटुंबे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेती करत आहेत. अशा कुटुंबांना वेळेवर दर्जेदार बियाणे उपलब्ध झाल्यास त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सामाजिक संस्था आणि दातृत्व संस्थांच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवचेतना संस्थेचे महादेव जोगदंड, लक्ष्मी बोरा, कौशल्य थोरात, ज्योती लोकरे, निर्मला जाधव तसेच संस्थेचे इतर कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. वितरण प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची नोंदणी, पडताळणी आणि नियोजनबद्ध पद्धतीने बियाणे वाटप करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या शेतकरी महिला व शेतकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. वाढत्या शेती खर्चाच्या काळात मोफत बियाणे मिळाल्याने खरीप हंगामाची तयारी अधिक आत्मविश्वासाने करता येणार असल्याची भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेती अधिक सक्षम करण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांचे योगदान महत्त्वाचे ठरत असून, नाम फाऊंडेशन आणि नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला हा उपक्रम त्याचेच एक प्रभावी उदाहरण ठरला आहे.
