बीड जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करा

बीड! प्रतिनिधी

 

यावर्षी बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतातील पिके मातीत मिसळली. यातूनही कापसासारखी पिके काही प्रमाणात हाती लागली आहेत, परंतु शासनाने अद्याप खरेदी केंद्रे सुरू केलेली नाहीत. यामुळे शेतकरी अडचणी सापडलेला असून शेतकऱ्यांचे सोयीसाठी तातडीने कापूस केंद्र सुरू करावेत, असे पत्र खा.बजरंग सोनवणे यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, छ.संभाजीनगरचे महाप्रबंधक यांना पाठविले आहे. एकूणच शेतकऱ्यांच्या विषयात खा.सोनवणे हे कायम पाठपुरावा करत आहेत.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, छ.संभाजीनगरचे महाप्रबंधक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, बीड जिल्हा हा प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यापैकी एक असून येथील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केलेली आहे. परंतु सीसीआयकडून बीड जिल्ह्यात खरेदी केंद्र आद्याप कार्यान्वित झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना दूरवरच्या केंद्रांवर कापूस विक्रीस नेण्यासाठी वाहतूक खर्च, प्रतीक्षा वेळ व तोलणीतील अडचणी यांचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, स्थानिक व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. बीड जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्र सुरु करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट किमान समर्थन मूल्यावर कापूस विक्रीची संधी उपलब्ध होईल. चालू हंगामासाठी बीड जिल्ह्यात सीसीआय खरेदी केंद्रे तातडीने सुरु करावीत, असे म्हटले आहे. खा.बजरंग सोनवणे यांना राज्यभरात शेतकरीपुत्र म्हणून ओळखले जाते. ते कायम शेतकऱ्यांच्या विषयावर पोटतिडकीने संसदेत देखील प्रश्न मांडत असतात. जिल्ह्यातील शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत असतात, तेव्हा ते सर्वात अगोदर त्याठिकाणी धावून जात असतात, असा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. जिल्ह्यात मागील महिन्यात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीचे आणि पिकांचेही अतोनात नुकसान झालेले आहे. अशा संकटात काही ठिकाणी अत्यल्प कापुस शेतकऱ्यांच्या हाती लागलेला असून आता त्याची विक्री करायची कुठे?, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यामुळे खा.बजरंग सोनवणे यांनी या विषयात लक्ष घालून खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *